Monday 4 December 2017

आग्रा भेट - कैद - सुखरूप सुटका

कैद -
शिवाजी महाराज हे एकुलते एक योद्धे आहेत ज्यांना आमंत्रण देऊन त्यांना आग्य्रााला बोलावले गेले व सन्मानाऐवजी नंतर कैद फर्माविली गेली.

महाराज स्वत: तर निसटलेच पण त्यांचे १५०० साथीदारसुद्धा सुरक्षितपणे मायदेशी परतले. हे पलायन जगातील सर्वात धक्कादायक पलायन आहे.











आग्रा भेट

संपूर्ण दरबार स्तब्ध होऊन महाराजांकडे पाहत होता. सर्व जण शिवाजी महाराजांच्या विभूती व्यक्तिमत्वाचे दर्शन घेत होते. सह्याद्रीचा स्वाभिमान विजेच्या कडेलोटा प्रमाणे औरंगजेबाच्या दरबारामधे हलकल्लोळ करत होता. औरंगजेबासमोर दरबारात मान वर करून बघणे म्हणजे गुन्हाच पण सह्याद्रीचा सिंह औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून गर्जना करीत होता. ही होती अबुल मुज्जफर मुईउद्दीन मोहम्मद औरंगजेब आणि प्रौढप्रताप पुरंदर क्षत्रियकुलावतंस शिवाजी महाराज यांची पहिली आणि शेवटची भेट. यांनतर हे दोघे कधी एकमेकांना भेटले नाहीत.


कवी भूषणाने लिहून ठेवले आहे -
चक्रवर्ती चकता चतुरंगिनी चारिऊ चापि लई दिसिचक्का
भूप दुरीन दुरे भनि भूषन एक अनेकन बारिधि नक्का
औरंगसाहिको साहि के नन्द लर्यो शिवसाहि बजाय कै डंका
सिंह की सिंह चपेट सहै गजराज सहै गजराज का धक्का
मराठी अर्थ – चक्रवर्ती चुगताई घराण्याचा वंशज औरंगजेबाने आपल्या चतुरंगदलाने चारी दिशांना आपला अंमल बसविला. कित्येक राजे दरी खोर्यात लपून बसले. काही समुद्रपार झाले. पण अशा औरंगशाहाविरुद्ध शाहजीनंदन छत्रपति शिवाजी महाराज डंके वाजवून
लढले.

सिंहाच्या पंजाचा फटकारा सिंहच सहन करू शकतो आणि हत्तीचा धक्का दुसरा हत्तीच करू शकतो !
महाराजांनी दरबारामधे केलेल्या प्रतिकारास भूषणाचे हे शब्द अगदी तंतोतंत बरोबर ठरतात……

अफ़जल ख़ान वध


शिवाजी महाराज प्रतापगडाच्या रणसंग्रामाच्या वेळी अफजलखानास भेटण्यासाठी गेले तेंव्हा शिवाजी महाराजांचे वर्णन करण्यासाठी कवी परमानंद यांनी अनल्पधी: हा शब्द वापरला आहे आणि तो शब्द शिवाजी महाराजांच्या कार्य, कर्तुत्व आणि पराक्रम यासाठी वापरलेल्या मुस्तद्दीपणा, बुद्धीमत्ता यासाठी सूचक असा आहे. शिवाजी महाराज आपल्या शत्रुंशी केवळ हातांनी, शस्त्रांनी लढले असे नाही. ते त्यांच्याशी बुद्धीने लढले.



बुद्धी हेच शरीराच्या आणि शस्त्राच्या लढाईचे अधिष्ठान होते, शिवाजी महाराजांच्या आयुष्यभराचा संघर्ष हा मूलतः बौद्धिक संघर्षच होता आणि तो शरीराच्या आणि शस्त्राच्या माध्यमातून व्यक्त होत होता. बुद्धीच सर्व कर्तुत्वाचे ऊर्जा केंद्र असते आणि तीच सर्व पराक्रमाची जननी असते. शरीर आणि विविध शस्त्र यांना आदेश, दिशा, अचूकता, नियंत्रण व विवेक देण्याचे काम बुद्धीच करत असते आणि शिवाजी महाराजांकडे तर ती "अनल्प" होती. अल्प म्हणजे थोड़ी. अल्प नव्हे ती अनल्प. आज आपल्याला शिवाजी महाराजांच्या चरित्रातून इतर गोष्टींबरोबर या अनल्प बुद्धीचा वारसा घेण्याची - बुद्धीने लढण्याचे त्यांचे तंत्र आत्मसात करण्याची गरज आहे..

"छत्रपती संभाजी महाराज "

"छत्रपती संभाजी महाराज "
शंभुराजांना पकडून जेव्हा औरंगजेबासमोर आणलं, तेव्हा तो औरंगजेब "सिवाच्या पोराला" पाहायला सिंहासन सोडून खाली उतरला. अत्याचाराने माराने घायाळ झालेले शरीर, पण....मान ताठच, नजर हि तशीच....
त्या नजरेकडे पाहत औरंगजेब विचार करू लागला....
तो हाच का संभा?? ज्याने ह्या आलमगीराला नऊ वर्षे रानोमाळ हिंडवल.... एखादा मेंढपाळ आपल्या मेंढ्या घेऊन फिरतो तद्वतच ह्याने मला फिरवलं.....
माझे नामांकित सरदार ज्यांच्या शौर्यावर मी अनेक लढाया जिंकल्या, त्यांनाच ह्याने आस्मान दाखवलं??
माझी कैक लाखांची सेना... लांबून एखाद्याने पहिली तर छातीत धडकीच भरावी एवढं अफाट अफाट मनुष्यबळ.... पण ह्या संभाजीने पार वाट लावली त्यांची,
तो हाच का संभाजी?? वाटलं होत संभा म्हणजे शिवाजीच्या पोटाला आलेला तख्तनशील वारीस, संभाजी म्हणजे व्यसनी, दुराचारी, संभाजी म्हणजे बदफैली, संभाजी म्हणजे नादान बच्चा सिवाचा, पण..... पण नाही, माझा अंदाज साफ चुकला,
ह्या नादान पोरानं बुढाप्यामध्ये मला जवान बनवलं, त्या सिवापेक्षा दहापट अधिक तापदायक आहे हा संभाजी.....
अरे त्या सीवाने माझे किल्ले किल्ले जिंकले, प्रदेश जिंकला पण कधी बुऱ्हाणपूरला हात नाही घातला, पण हा संभाजी गादीवर आला आणि सगळ्यात आधी ह्याने बुऱ्हाणपूर लुटलं, भागानगर जाळून टाकलं, कैक कोटींचा खजिना ह्याने ओढून आपल्या वळचणीला टांगला...
साढे आठ वर्षांचा असताना हा आला होता सिवाबरोबर आग्र्यात, त्यावेळी मी त्याला विचारलं होत... "क्यों रे संभा, तुम्हे डर नही लगता हमारा??" तेव्हा हा म्हणाला होता, "हमें किसीका डर नही लगता, पर हमारी वजाहसे सबको डर लगता है." हाच तो संभाजी....
पुरे हिंदुस्थान के आलमगीर होना चाहते है हम... पण माझ्या ह्या महत्वाकांक्षेलाच यानं छेद दिला, बुढाप्यामध्ये जवान बनवला ह्या पोराने मला, ह्याची माणसं हि तशीच बेडर, धाडसी, पराक्रमी,
तो तो तो नाशिकचा किल्ला "रामशेज".... किल्याच्या खाली माझी ३०-४० हजारांची फौज आणि किल्ल्यावर ह्याची अवघी ६०० माणसं, पण सहा वर्षे अजिंक्य ठेवला किल्ला त्यांनी, माणसाच्या हृदयात काय पेरतो हा कुणास ठाऊक??
मी इंग्रजांना ह्यांच्याविरुद्ध चिथावलं, पुर्तुगीझांना ह्यांच्याविरद्ध उभं केलं, सिद्धी ला ह्याच्या विरुद्ध लढायला प्रवृत्त केलं, पण सगळ्यांच्या उरावर पाय देऊन हा उभा राहिला, इंग्रजांना चारी मुंड्या चित केलं, पुर्तुगीझांची हाडे खिळखिळी केली, जंजिऱ्याच्या सिद्धीचा तर कंबरडंच मोडलं ह्याने, माझं कैक लाखाचं सैन्य, माझे नातलग, माझे शाहजादे ह्या सगळ्यांवर जबरदस्त जरब बसवली ह्याने, माझ्या सैन्याने तर आपण कुठे मरणार हे पण गृहीत धरलं होत.
मद्रास, पाषाणकोट, तंजावर, जंजिरा, प्रत्येक जागी हा आणि ह्याची माणसे आहेतच, जळी स्थळी काष्टी पाषाणी जणू हाच दिसत होता मला, कसल्या मिट्टीचा बनलाय हा??
औरंगजेब आसन सोडून उठला आणि त्या खुदाचे आभार मानायला जमिनीवरून गुडघे टेकून बसला..... "अय खुदा, आखीर तुने वो दिन दिखाया..... शुक्रगुजार है हम तेरे"
त्याच वेळी शंभूराजे कविराज कलशांना विचारते झाले, "काय कविराज ह्या अशा वेळी सुचतीय का एखादी कविता?"
आणि तत्क्षणी कविराज बोलते झाले.... "राजन तुम हो सांझे, खूब लढे हो जंग, देख तुम्हारा प्रताप महि, तखत त्यजत औरंग"
याचा अर्थ असा : राजन काय लढलात आपण... काय तुमचं ते शौर्य.... तुमचा प्रताप पाहून हा औरंगजेब स्वतःच सिंहासन सोडून तुमच्या समोर गुढघे टेकून बसलाय.....
आणि मग सुरु झालं अत्याचारांचा पाशवी खेळ, ४२ दिवस सतत, सलग, क्षणाक्षणाला, भीमा-इंद्रायणी सुद्धा आसवं गळू लागल्या....
ह्या अत्याचारांच्या शृंखलेत एक दिवस असाही आला जेव्हा "मियाखान" ज्याच्या दोन्ही मुलींची लग्ने स्वतः संभाजीराजांनी स्वतःच्या बहिणी समजून लावून दिली होती, तो आला... पाहिलं त्याने "मराठ्यांच्या राजाची झालेली दुरावस्था", डोळे काढलेत, कान कापलेत, हातापायाची बोटे छाटलीत, रक्त....फक्त रक्त ठिबकतंय त्यातून... चामडी सोलून काढलीय पूर्णांगाची.... त्यावर बसणारे किडे, माश्या पहिल्या, त्यांचा होणार त्रास बोलून दाखवायला वाचाच राहिली नव्हती.... जीभ छाटली होती माझ्या राजाची....
तो मियाखान अशाही परिस्थितीत विचारता झाला शंभू राजांना, "राजं वाचवू का तुम्हाला?? घेऊन जातो तुमच्या स्वराज्यात..." आवाज ओळखीचा वाटला तशी शरीराची तगमग, तडफड सुरु झाली, हातपाय हलायला लागले, उठून बसायचा एक केविलवाणा प्रयत्न आणि तो हि सपशेल फसला.... सततचे अत्त्याचार सोसून जर्जर झालेला देह साथ देईनासा झाला.... आणि त्यांची अशी अवस्था पाहून पुन्हा मियाखान बोलला.. " नको राजं.... नकोच..... तुम्हाला हा असा स्वराज्यात घेऊन गेलो तर तिथली रयत माझ्यावर छी थू करेल, मलाच मृत्यूच्या दाढेत लोटून देईल... विचारेल मला ज्याने तुझ्या मुलींची लग्ने स्वतःच्या बहिणी समजून लावून दिली त्या... त्या आमच्या राजाची अशी अवस्था झाल्यावर त्याला आमच्याकडे घेऊन येताना तुला लाज नाही वाटली का?? नाहीत सहन होणार मला त्यांच्या आरोपांच्या फैरी.... त्यापेक्षा तुम्ही इथ मेलेलंच बरं...."
हे शब्द ऐकताच थरारला-शहारला छावा, साखळदंडांनी जखडलेल्या देहाला हिसके बसायला सुरुवात झाली.... त्यांच्या आवाजांनी त्या भयाण रात्रीची शांतता भंग पावली, चोरट्या पावलांनी शंभुराजांना भेटायला, पाहायला आलेला मियाखान मृत्यूच्या कराल दाढेत अडकल्यासारखा जागच्या जागीच थिजून थरथरायला लागला... मशाल विझली.... आणि त्यातून ऐकू येऊ लागला साखळदंडांचा संथ आवाज... काही वेळानंतर तो आवाजही थांबला..... संभ्याला काय झालं हे पाहायला आलेल्या एका पहारेकरी हशमाला तो रक्तात लोळागोळा होऊन पडलेला शंभूंचा देह हातातल्या मशालीच्या उजेडात दिसला.... तो पाहिल्यावर एक विषारी फुत्कार टाकून तिथे असलेली एक मशाल पेटवून तो हशम शंभूराजांपासून निघून गेला...
अंधारात लपून बसलेला मियाखान काही वेळानी बाहेर पडला.... मघाचा साखळदंडांचा आवाज त्याला राजापर्यंत यायला भाग पाडत होता.... तो आला... आला... जवळ आला... समोरच्या मशालीच्या उजेडात मघाची झालेली हालचाल कशासाठी होती हे शोधू लागला आणि तिथल्याच एका दगडी शिळेवर बोटं तुटल्या हाताने शंभूराजांनी लिहिलेले शब्द वाचून पुरता शहारला... ती वाक्ये होती "वाचवाच मला खांसाहेब, माझ्या नुसत्या जिवंत असण्यानेसुद्धा हा औरंगजेब बादशहा खंगून खंगून मारून जाईल.... वाचवाच मला खांसाहेब"
मरणाच्या दाढेत पडलेला असूनसुद्धा... अरे मृत्यू देहावर, विचारांवर थैमान घालत असताना सुद्धा फक्त आणि फक्त स्वराज्यासाठी जगायची, रयतेसाठी लढायची, अशाही परिस्थितीत असलेली दुर्दम्य इच्छाशक्ती पाहून पुरता भारावून गेला... एखाद्या लहान बाळासारखा मुसमुसून रडायला लागला.... अल्लाहकडे हात पसरून बोलायला लागला, "इन्सानियत का सच्चा वारीस आज तेरे करीब आ रहा है, उसपे अपनी रेहमात बरसा, तेरे जन्नत के दरवाजे इस पाकदिल इन्सान के लिये हमेशा खुले रख"....
अरे दुष्मनाच्या काळजात घर करून राहिलेला... दुश्मन ज्याच्या अफाट ताकदीचा चाहता झाला... त्या.... त्या महाराष्ट्राच्या दुसऱ्या छत्रपतीला, दस्तुरखुद्द छात्रपती शिवरायांच्या छाव्याला आमच्या स्वकीयांनीच रेखाटताना खूप वेगळा रेखाटला....
आम्हाला संभाजी सांगितला ना...
पण तो सांगितला असा...
संभाजी म्हणजे व्यसनी, बदफैली, रगेल आणि रंगेल, आणि तेवढाच संभाजी आम्ही लक्षात ठेवून त्याच बलिदान मात्र सोयीस्कररीत्या विसरून गेलो..
९ वर्षे... सलग ९ वर्षे... इंग्रज, पोर्तुगीझ, सिद्धी, मोघल अशा एक नाही तब्बल बारा बारा आघाड्यांवर स्वराज्यासाठी दुश्मनांची ससेहोलपट करणारा संभाजी आम्हाला कुणी सांगितलाच नाही...
वयाच्या १४ व्या वर्षी संस्कृत पंडित ठरलेला, सातसतक, नखशिखा, बुधभुषणंकार झालेला नृपशंभो आम्हाला कुणीच नाही दाखवला,
दुष्काळाने पीडित रयतेला शेतसारा माफ करून सरकारातून पैसे आणि बी-बियाणं पुरवून शेतीला आणि शेतकऱ्याला आधार देणारा जाणता राजा नाही सांगितला...
तब्बल १४० लढाया करून एकही लढाईत पराभूत न झालेला रणमर्द सर्जा संभाजी आम्हाला कळूच दिला नाही कुणी...
स्वतःच्या बायकोला "स्त्री सखी राज्ञी जयती" असा 'किताब देऊन तत्कालीन पुरुषप्रधान संस्कृतीला उघड आव्हान देत स्त्री पुरुष समानतेचं मूळ धरून मुलखीं कारभार सोपवणारा द्रष्टा सुधारक कधी सांगितलाच नाही आम्हाला....
वडिलांच्या स्वराज्यमंदिरावर स्वतःच्या प्राणांची आहुती देत कळस चढवणारा, "पुत्र व्हावा ऎसा गुंडा-ज्याचा तिन्ही लोकी झेंडा" ह्या तुकोबारायांच्या पंक्तीला पुरून उरलेला सज्ञान कर्ता पुत्र नाही सांगितला...
भक्ती आणि शक्तीचा सुंदर मिलाफ ठरलेली पंढरपूरची वारी आणि संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर आदी विभूतींच्या पालख्या सुरु करून त्यांना सरकारातून खर्च आणि संरक्षण देणारा संस्कृती पुरस्कर्ता नाहीच दाखवला..
रामशेज सारखा सगळ्यात कमी उंचीचा पठारी किल्ला सतत सहा वर्षे कमी मनुष्यबळावर झुंझवता ठेवणारा झुंझार रणमर्द नाही दाखवला....
रयतेला छळणाऱ्या सिद्धीला समुद्रात बुडवायचा चंग बांधून ८०० मीटर लांबीचा समुद्रात भराव टाकून पूल बांधणारा इंजिनियर नाहीच सांगितला...
राजद्रोहासारखे गंभीर गुन्हे माफ करून वडिलधाऱ्यांचा मान आणि इज्जत अबाधित ठेवणारा एक मानी संस्कारी राजा नाही सांगितला कुणी...
बाणांच्या वर्षावात मनुष्यहानी होऊ नये म्हणून जनावरांच्या कातडीची जॅकेट तयार करून सैन्याची काळजी वाहणारा रणमर्द झुंजार नाही दाखवला....
मराठ्यांच्या स्वराज्याचा दुसरा छत्रपती, धाकलं धनी संभाजी महाराज....
ज्याचा जवळचा मित्र रायाप्पा एक "महार",
ज्याला सोडवायला तयार झालेला मियाखान एक "मुसलमान",आपल्या धन्याच्या मरणाची वाट आपण शत्रूला दाखवली म्हणून १०-१२ वर्षांच्या वयात पश्चात्ताप करत शत्रुलाटेवर तुटून पडत त्यांच्या छावणीतले डेरेदांडे जाळत मृत्यू जवळ करणारी ती आठ पोरं "धनगर",
मलकापुरात दहा हजाराची राखीव आणि अजिंक्य फौज तयार करून देणारा, कवी आणि कवित्व जपतानाच राजधानी रायगडावर आलेलं शत्रू वावटळीची शेंडीला गाठ मारून धूळधाण उडवणारा... राजाचा श्वास जणू असा कविराज कलश एक "ब्राम्हण",
"#ब्राम्हण म्हणून कोण मुलाहिजा ठेवतो?? आणि #मराठा म्हणून कोण पाठी घालतो"?? अशी कणखर भूमिका ठेवणारा द्रष्टा व बहुजनवादी राजा म्हणजेच स्वराज्याचे दुसरे छत्रपती... धाकलं धनी.... महाराज... रणमर्द झुंजार... छावा....

मराठ्यांचे तांडव

शाहूंची जिद्द आणि मराठ्यांचे तांडव - सिद्दीचे मुंडके छाटून रायगडवर पुन्हा भगवा फडकवला !
#शाहूपर्व
छत्रपती शाहूंच्या नेतृत्वाखाली मराठ्यांच्या घोडी नर्मदापार पोचल्या होत्या. माळवा ,गुजरात, कर्नाटक अगदी दिल्ली पर्यंतचे मुलुख टापाखाली आले होते.पण शिवरायांची राजधानी आणि मराठ्यांचे तख्त असलेला 'रायगड' आणि जिजाऊ राहत होत्या ते पाचाड १६८९ पासून म्हणजे ४४ वर्षे पारतंत्र्यात होते, हि सल शाहूंच्या मनात होती आणि मोठ्या मोहिमेचे नियोजन करून रायगड स्वराज्यात आणण्याचे मनसुबे होते.रायगड त्यावेळी जंजिरेकर सिद्दीच्या ताब्यात होता.
रायगड जिंकणे हा शाहू छत्रपतींनी प्रतिष्ठेचा मुद्दा केला होता. १७३३ साली मोहिमेला सुरुवात झाली.
या मोहिमेची आखणी त्यांनी स्वतः केली.मराठेशाहीची संपूर्ण ताकद त्यांनी रायगड जिंकण्यासाठी लावली, रायगड मोहिमे व्यतिरिक्त फक्त पानिपतातच इतके मोठे सरदार आणि सेनापती एकत्र उतरले असावेत.
राजपुत्र फत्तेसिंह भोसले, बाजीराव पेशवे,छत्रपतींची हुजुरातीची फौज,पिलाजी जाधवराव,सरखेल सेखोजी आंगरे,सरलष्कर दावलजी सोमवंशी,सेनापती दाभाडे, येसाजी गायकवाड, हिम्मतबहाद्दर उदाजी चव्हाण,श्रीपतराव पंतप्रतिनिधी, चिमाजी आप्पा, भुईंजकर जाधवराव,कृष्णाजी खटावकर,उदाजी पवार,महाडिक,घोरपडे असे दिग्गज सेनानी कोकणात उतरल्याने रायगड परिसराला रणांगणाचे रूप आले.१५-२० आघाड्यांवर युध्द सुरु झाले.

मे महिन्याच्या आतच मोठे यश मराठ्यांना प्राप्त झाले बिरवाडी,अवचितगड,घोसाळगड,सुरगड,मदनगड,मंडणगड,विजयगड आणि बाणकोट हे किल्ले ताब्यात आले.


फत्तेसिंह भोसले आणि प्रतिनिधी यांनी रायगडला वेढे दिले, मराठ्यांनी सिद्दीचा एक मुलगा आणि एक सेखजी नावाचा सरदार आपल्या बाजूने आणला होता, त्यांना पुढे करून रायगड फंदफितुरीने घेण्याचे प्रयत्न होते.
प्रयत्नास यश येऊन ६ जून म्हणजे शिवरायांच्या राज्याभिषेकदिनीच रायगड वर भगवा फडकला.
गड मराठ्यांनी जिंकल्याने सिद्दी चवताळला सिद्दी अंबर ने रायगड परिसरात धुमाकूळ घालायला सुरुवात केली, अनेक महिने चकमकी चालली, शेवटी १० जानेवारीला सिद्दी अंबर शी निकराचे युद्ध झाले.
छत्रीनिजामपूर, पाचाड येथून रेटत मराठ्यांनी सिद्दी ला रायगड जवळ आणले, गडावरून खाशा फौज आली दोन्हीच्या मध्ये सापडून सिद्दी अंबर आणि त्याचे हजार भर सैन्य या युद्धात ठार झाले.


शाहू छत्रपतींनी सिद्दी अंबर चे डोके कापून सातार्याला मागवले आणि जिवंत सापडेल त्या सिद्दी सैनिकांची डोकी कापावी,पाचाड व रायगड वाडी येथील सिद्धीचे वाडे तोफांनी उडवून टाकावे असे आदेश दिले.
सरदार कृष्णाजी खटावकर ,किल्लेदार जिवाजी लाड यांच्यासह अनेक मावळ्यांनी आपल्या रक्ताचा अभिषेक घालून रायगड पुन्हा स्वतंत्र केला.
शाहू छत्रपतींनी फत्तेसिंहबावा,बाजीराव,प्रतिनिधी यांचा मानाची वस्त्रे आणि मोठी बक्षिसे देऊन गौरव केला.


अनेक मातब्बर मोहिमेत पहिल्यांदाच एकमेकांच्या बरोबरीने काम करत असल्याने चुरस निर्माण झाली त्यामुळे प्रत्येकाने पराक्रमाची शर्थ केली.
सिद्दीने अनेक जाचक कर प्रजेवर लावले होते,तेथील अनेक धार्मिक स्थळे उध्वस्त केली होती,लोकांना गुलामांच्या बाजारात विकण्यात येत.
या छळातून प्रजेची कायमची मुक्तता झाली.रायगडचे तख्त पुन्हा ताब्यात आले होते, कैलासवासी छत्रपती शिवरायांची राजधानी स्वराज्यात आल्याचे अतीव समाधान त्यांचे नातू शाहू छत्रपतींना झाले.रायगडाचा सुवर्णकाळ पुन्हा चालू झाला होता.

मराठे

मराठे

विजापुरचा कवी नुस्नाती त्याच्या 'अलिनामा' मध्ये म्हणतो,"मराठ्यांच्या घोडयाना जणू पंख होते. एक-एक घोड़ा सैनिकांपेक्षा ही वरचढ़ होता. मराठ्यांची प्रत्येक घोडी म्हणजे जणू परीच. ती चंद्राची सखी असते. मराठा वीर जेंव्हा काव्याने लढू लागतो, तेंव्हा सारे विश्व नदीच्या भोवऱ्यात सापडल्यागत होते.


मराठा शिपाई रणावर तळपू लागला म्हणजे जणू तो वाऱ्याशी गुजगोष्टी करीत असतो. अश्यावेळी त्याचे मुंडासे हात-हात वर उड़ते; धरती त्याच्या हालचालीने डळमळू लागते." पुढे तो म्हणतो,"वाऱ्याचाही शिरकाव होणार नाही अश्याही स्थळी मराठे सैनिक जाउन पोचतात.

किंबहुना अश्या ठिकाणी प्रवेश करणे मराठ्यांच्या घोडयाना एक प्रकारचा खेळ वाटतो. या लष्कराने आणि शिवाजीने आकाशाशी स्पर्धा करणारे उंच-उंच गड़ चढून काबीज केले. जहाजत बसूनही मराठे लढले आणि त्यांनी फिरंग्यान्ना धाक बसवला. त्यांच्या वर्दळीमुळे समुद्रावर नेहमीच तूफ़ान येत राहिले."

दक्षिणदिग्विजय मोहिमेदरम्यान फ्रेंचमन मार्टीन आपल्या डायरीमध्ये अशी नोंद घेतो

आग्रा भेट - कैद - सुखरूप सुटका

कैद - शिवाजी महाराज हे एकुलते एक योद्धे आहेत ज्यांना आमंत्रण देऊन त्यांना आग्य्रााला बोलावले गेले व सन्मानाऐवजी नंतर कैद फर्माविली...